नवी दिल्ली | देशातील शेतकरी वर्गात प्रसिध्द असणाऱ्या पीएम किसान योजनेत तब्बल ११० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. हा घोटाळा तामिळनाडूमध्ये उघडकीस आला असून घोटाळ्यात सरकारी अधिकारी व स्थानिक पातळीवरील नेत्यांनी पैशांची लूट केल्याचे निदर्शनास आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात काही निर्बंध शिथिल केल्यानंतर हा घोटाळा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या ११० कोटी रुपयांचा राज्याच्या १३ जिल्ह्यातील ५.५ लाख गरजू शेतकऱ्यांना फायदा झाला असता. घोटाळ्यात सामील असणाऱ्यांनी लाभार्थी यादीत बनावट नावे घुसडल्याचे समोर आले आहे.
पीएम किसान योजनेतील हा घोटाळा तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिची, विल्लुपुरम, कुड्डालोर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, रानीपेट, सालेम, धर्मपुरी, कृष्णगिरी व चेंगलपेट जिल्ह्यात झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सालेम जिल्ह्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळली असल्याचा आरोप द्रमुकचे नेते स्टालिन यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात १८ एजंटना ताब्यात घेतले असून, या योजनेशी निगडित असलेल्या ८० अधिकारी तसेच प्रशासनातील ३४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये राज्याच्या कृषी खात्यातील तीन सहाय्यक संचालक आहेत. ११० कोटी. रु.च्या घोटाळ्यातील ३२ कोटी रु.ची वसुली झाली असून अन्य पैसे येत्या ४० दिवसात मिळतील, असे तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे.