पालघर। कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काहींनी आपल्या गावी जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केला आहे. मात्र असा प्रवास करणेच आता काहींच्या जीवावर बेतले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहनांना बंदी असल्याने पायी प्रवास करत गावी जाणाऱ्या मजूरांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका टेम्पोने उडवलं आहे. यात चार जणांचा जागीच मृत्यु झालाय. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने यांना जोराची धडक दिली.
या अपघातातील २ जणांची ओळख पटली असून ५ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी (३२) तर दुसऱ्याचं नाव मयांक भट (३४) असं आहे.