मुंबई | गेले चार दिवस मुंबईसह कोकणाला पावसाने झोडपले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाताही सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात झालेल्या पावासामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे तर मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला. दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे आज जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्यापासून तो पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. कोकणच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशचा परिसर, जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरही अतिवृष्टी होणार असून मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे.