उस्मानाबाद । नवा पक्ष काढून सौदेबाजी करायला त्यांना आणखी एक व्यासपीठ मिळेल, अशा शब्दात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागलीय. मी कधीही मॅनेज होत नाही असे सांगत राजू शेट्टी यांनी सत्तेला कोण चिटकले आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे शेतकरी माझ्या पाठीशी कायम आहेत. सदाभाऊंच्या मागे एकही शेतकरी यायला तयार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी खोत यांना लगावला. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना राजू शेट्टींनी ही प्रतिक्रिया दिलीय.
मी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात षडयंत्र रचले नाही. कडकनाथ कोंबडी प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सत्तेचा गैरवापर झाल्याने सागर खोतवर गुन्हा दाखल होऊनही त्याला साक्षीदार करण्यात आले. त्यामुळे कांगावा करण्यापेक्षा खोतांनी चौकशीला सामोरे जावे. मी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली.
हातकणंगले येथे मी खासदार होणार की नाही हे येणारा काळच ठरवेल असे सांगत मी वैफल्यग्रस्त नाही, उलट सदाभाऊ आदळा आपट करीत आहे. शेतकऱ्यांना फसविणे राज्यकर्त्यांना यांना परवडणारे नाही. चिंतामुक्त करण्याचे आश्वासन देऊन सत्ता घेतली मात्र आश्वासन पूर्ण न केल्यास शेतकरी सत्ता घालवतो, हेही सरकारने ध्यानात ठेवावे असंही शेट्टी यावेळी म्हणाले.
यावेळी शेट्टी यांनी सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरही टीका केली. जनतेच्या पैशावर त्यांनी दरोडा टाकला. उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना सोयाबीन पीक विमा नाकारला हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्यपाल नुकसान भरपाई देतात, मात्र विमा कंपन्या हजारो कोटींचा पीकविमा घेऊन नफा कमविता आणि नुकसान भरपाई देत नाहीत, हजारो पुरावे दिले तरी कारवाई होत नाही, याची चौकशी करणेही गरजेचे असल्याचे शेट्टी म्हणाले.