नवी दिल्ली। लॉकडाऊनमुळे शेतीमालाच्या विक्रीतील अडचण दूर करण्यासाठी केंद्रसरकारने थेट शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीने कडधान्ये, तेलबिया खरेदी सूरू केली आहे. सरकारने आत्तापर्यंत १ लाख १४ हजार ३३८ शेतकऱ्यांकडून ७८४ कोटी ७७ लाख रूपयांची कडधान्ये आणि तेलबियांची खरेदी केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्यात एसएमपी दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. नाफेड, एफसीआय यासारख्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून २०२०-२१ च्या रब्बी हंगामासाठी ही खरेदी केली जात आहे. १६ एप्रिल अखेर १,३३,९८७ मेट्रिक टन कडधान्ये तर २९,२६४ मेट्रिक टन तेलबियांची खरेदी करण्यात आली आहे.
दरम्यान डाळींचा बफरस्टॉक तयार करण्यासाठी देखील मुल्य स्थिरीकरण निधीअंतर्गत एमएसपी दराने महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी सुरू आहे. २०१९-२० च्या खरीप हंगामात ५३२८४९ मेट्रिक टन तुरीची खरेदी झाली आहे, यातील २९३२८ मेट्रिक टन तुरीची खरेदी लॉकडाऊननंतर करण्यात आली आहे.