कोरोना विषाणूमुळे राज्य धोक्यात असताना राज्यातील काही लोकांच्या डोक्यात अद्यापही असंवेदनशीलपणाचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच वाटेने जाताना दिसत असून त्यांच्या घाणेरड्या राजकारणाने कळस गाठल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ३० मार्चला आपल्या ट्विटर हॅंडलवरून कोरोनासाठी PM Cares फंडातच मदतनिधी गोळा करण्याचे आवाहन केलंय. त्याचबरोबर त्यांच्या या ट्विटनुसार ‘ज्याला जनादेश नाही, त्याला धनादेश नाही’ ही मोहिम महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात सोशल मिडीयात चालवली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर याबाबत मत व्यक्त करण्यात आले असून यामध्ये… कोरोनाचं संकट सर्वाधिक जर कोणत्या राज्याला भेडसावत असेल तर ते महाराष्ट्राला. आणि अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री फडणवीस अतिशय घाणेरडं राजकारण करताना दिसतायत. आजघडीला राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी, कर्मचारी, समाजसेवी संघटना या आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता कोशात आपले योगदान देताहेत. आणि हा माणूस प्रधानमंत्री सहाय्यता कोशाला निधी देण्याबाबत लोकांना आवाहन करतोय. याचीच री ओढत भाजपच्या काही नीच कार्यकर्त्यांनी ‘ज्याला जनादेश नाही त्याला धनादेश नाही’ यासारखे राज्यद्रोही अभियान सोशल मीडियात चालवले आहे.
माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की वेळीच या विषवल्लीला ओळखा आणि आपला महाराष्ट्र धर्म जपा. आज राज्याला तुमच्या मदतीची गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करा. धन्यवाद.! असे म्हणटले आहे. ही पोस्ट – डॉ. सुरज मोटे, उस्मानाबाद यांच्या नावानिशी पोस्ट करण्यात आली आहे.
एकूणच सध्याच्या घडीला राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेले राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे असल्याचे मत सुज्ञ महाराष्ट्रवासियांकडून व्यक्त होत आहे.